23/04/2026
रिक्षा रजीस्टर फक्त ४ लाख बाकीच्या कुठून युपीवरुन आणणार???
मनसे नेते अविनाश जाधव यांची पोलखोल
१५ लाख रिक्षाचालक संपावर जाणार असल्याच्या सुरु असलेल्या चर्चांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी सडकून टीका केली आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमधील रिक्षांच्या खऱ्या आकड्यांचा आणि आरटीओ अहवालाचा हवाला देत त्यांनी संपकऱ्यांवर थेट निशाणा साधला असून, “१ तारखेला संप करा नाहीतर यूपी-बिहारला परत जा,” असा सज्जड दमच भरला आहे.
काय आहे सविस्तर प्रकरण?
अविनाश जाधव यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक पोस्ट आणि आरटीओची आकडेवारी शेअर केली आहे. त्यानुसार:
• गेल्या ४ दिवसांपासून १५ लाख रिक्षावाले संपावर जाणार असल्याची खोटी माहिती पसरवली जात आहे.
• प्रत्यक्षात मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये मिळून केवळ ४ लाख रिक्षा आहेत.
• यापैकी ६० ते ६५% रिक्षाचालक हे भूमिपुत्र (मराठी) आहेत.
“संपासाठी यूपी-बिहारवरून रिक्षा मागवणार आहात का?”
खोटे आकडे सांगून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न काही लोक करत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. जर एकूण रिक्षाच ४ लाख आहेत, तर उर्वरित रिक्षा काय यूपी-बिहारवरून संपासाठी मागवणार आहात का? असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
१ तारखेच्या संपाबाबत मनसेची ठाम भूमिका:
“१ तारखेला तुम्ही संप करा नाहीतर यूपी-बिहारला परत जा, आम्हाला काही फरक पडणार नाही,” अशी अत्यंत स्पष्ट आणि आक्रमक भूमिका त्यांनी मांडली आहे. संप झाला तरी एकही माणूस १ तारखेला रिक्षाची वाट बघत थांबणार नाही; वेळप्रसंगी आम्ही आमच्या स्वतःच्या गाड्या काढून लोकांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवू, असा शब्दही त्यांनी सर्वसामान्यांना दिला आहे.