04/03/2025
वसई ते डहाणू पर्यंतचा विकास शेषवंशी सम्राट सातकर्णीं व सोमवंशी राजा बिंबदेवाच्या दूरदर्शी धोरणांनुसार व्हावा - वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य
पालघर जिल्ह्याची भूमि ही भगवान परशुरामांनी त्रेतायुगाच्या प्रारंभकाळात निर्मिली. तसेच या क्षेत्राची नागरी, प्राकृतिक व सामरिक रक्षणाची अत्यंत कौशल्याने व्यवस्था केली. भगवान परशुराम हे निष्णात तंत्र व पर्यावरण विशेषज्ञ असल्याचे भरपूर दाखले तत्कालीन वांग्मयात सापडतात.
आता वसई ते डहाणू पर्यंत चौथी मुंबई, वाढवण बंदर वगैरे करण्याच्या महत्वाकांक्षी योजना विकासोन्मुख असलेले वर्तमान केंद्र व राज्य सरकार आखत आहे. काहींचे म्हणणे आहे कि वसई तालुक्याचा विकास जपानच्या माकुहारी शहरासारखा करायचा विचार आहे.
पण भारतीय पॉलिटिशन्स बाबत जनतेला असा अनुभव आहे कि मुंबईचे शांघाई करायला गेले ते काहीतरी भलतेच झाले. काशी चे क्योटो करायला गेले ते ही भलतेच झाले. तर वसई चे जपान करायले गेले आणि त्याचे भलतेच काही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वसई ते डहाणुपर्यंतचा परिसर भौगोलिक, प्राकृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक दृष्ट्या फार वैशिष्ट्यपूर्ण व संवेदनशील आहे. याचा विकास सर्वस्वी पॉलिटिशन्स व ठेकेदारांच्या भरवशावर सोपवणे अवैज्ञानिक व अदूरदर्शीपणाचे ठरेल.
वसई ते डहाणूच्या पट्ट्यात सागरी किनारपट्टी क्षेत्र, नद्यांची खोरी, वन्यक्षेत्र व पर्वतीय क्षेत्र अशी चार भौगोलिक क्षेत्रे येतात. या सर्व क्षेत्रांची रचना, आव्हाने व उपाय योजना निरनिराळ्या कराव्या लागतात. तसेच हे भौगोलिक क्षेत्रात भूगर्भीयदृष्ट्या भूकंपप्रवण व सागरीदृष्ट्या खनिज तेल देणारे आहे हे विसरून चालत नाही.
वसई ते डहाणूच्या पट्ट्यातील सागरी किनारा हा प्रवाल वनस्पती, ४० प्रकारची मत्स्यबीजे,तिवरे व जीवनावश्यक मीठ उत्पादनासाठी उपयुक्त आहे. तर सागरकिनारच्या वाड्यांचे क्षेत्र उत्तम-दर्जेदार व निर्यातक्षम प्रकारचा भाजीपाला, ताडमाड, केळी,नागवेली उत्पादक क्षेत्र आहे. तर नदीकिनारा हा रेती, विटा, उंबर-खैर जातीय वनस्पतींचे व विविक प्रकारच्या सरिसृपांचे जनन क्षेत्र आहे. या परिसरातील पर्वतीय क्षेत्रे नैसर्गिक पाण्याचे स्रोत देणारे व साग-करंज-शीसम-साल-मोह वगैरे देशी वनस्पती व वन्य जीवांची अभय स्थाने आहेत. तर वन क्षेत्रात वारली, कातकरी, कोकणा, मल्हार कोळी वगैरे अनेक अनुसूचित जनजातींची व त्यांच्या संस्कृतीची स्थाने जोपासणारी व प्रचंड प्रमाणात रानभाज्या, रानमेवा, वनौषधी,बिबटे, मोर, हरणे, रानडुकरे, फुलपाखरे वगैरे वन्य जीवांच्या निवासाची स्थाने आहेत.
वसई ते डहाणूच्या पट्ट्यचा ऐतिहासिक दृष्ट्या भगवान परशुराम, भगवान राम, हनुमान, पाच पांडव, नवनाथ योगी, आद्य जगद्गुरु शंकराचार्य व परवर्ती जगद्गुरु शंकराचार्य, बुद्ध शिष्य पूर्णा, विद्वान तेजकंठ, जैन मुनि, राजा देवानां पिसदस्सी, सम्राट विक्रमादित्य,शेषवंशी सम्राट सातवाहन, सोमवंशी राजा बिंबदेव, छत्रपती शिवराय, छत्रपतींनी नियुक्त केलेले श्रीमंत पेशवे असा मोठा वारसा लाभला आहे.
वसई ते डहाणूच्या पट्ट्याच्या निर्मितीसोबतच वैदिक धर्मिय होते, २८०० वर्षांपासून जैनांचा सुप्पारक गच्छीय साधक आले, २५०० वर्षांपूर्वी बौद्धधम्मी आले, १००० वर्षांपूर्वी यहुदी व पारशी आले, ९०० वर्षांपूर्वी गुजरातेतून व मुंगी पैठणहून सोमवंशी व शेषवंशी क्षत्रिय तसेच आगरी आले. ५३० वर्षांपूर्वी मस्कत व गुजरातेतून मुस्लिम आले, ४८० वर्षांपूर्वी काही ख्रिस्ती झाले. पण या सर्व धर्म व जाती जमातींचे गुण्यागोविंदाने सहजीवन हे येथील धार्मिक वैशिष्ट्य आहे. तो अनुबंध विकासाच्या तडाख्यात येऊ नये.
वसई ते डहाणूच्या पट्टा सांस्कृतिक दृष्ट्या नागरी, ग्रामीण व जनजातीय संस्कृतींचे स्वतंत्र व सीमा क्षेत्र आहे. चौथी मुंबई बनवण्याच्या महत्वाकांक्षेपोटी यातील एकही संस्कृतीचा नाश होणे वा धोक्यात येणे मानवता व भारतीय परंपरांसाठी धोक्याचे ठरेल.
वसई ते डहाणुचा विकास पूर्वीही अनेकदा झाल्याचे दाखले सापडतात. पहिला विकास भगवान परशुरामांनी केला, दुसरा ज्ञात विकास धर्मराज युधिष्ठिराने केला, तिसरा विकास सम्राट विक्रमादित्य यांनी केला, चौथा विकास देवानांपिय पियदस्सी राजाने केला, पाचवा विकास सम्राट सातवाहनाने केला, सहावा विकास राजा बिंबदेवाने केला, सातवा विनाशक विकास पोर्तुगीजांनी केला, आठवा विकास छत्रपती शाहू प्रथम यांच्या पेशव्यांनी केला, नववा विकास पोस्ट-रेल्वे आणणार्या इंग्रजांनी केला, दहावा विकास वर्तक-ठाकुर या पॉलिटिशन्स ने शाळा-कॉलेज-बिल्डींगी बांधून केला. या सर्व दहा बदलांपुढे येत्या वर्तमान काळात शेषवंशी सम्राट सातवाहन व सोमवंशी राजा बिंबदेव यांच्या दूरदृष्टीच्या आधारे आताचा अकरावा विकास केल्यास वसई ते डहाणूचे भौगोलिक, प्राकृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आयाम सुरक्षित राहतील.
तेव्हा, वसई ते डहाणू पर्यंतच्या विकासाची धुरा केवळ पॉलिटीशन्स व ठेकेदारांच्या हाती न सोपवता वरील आयामाचे जागतिक तज्ञांचे सहाय्य व आमच्यासारख्यांच्या सदीच्छा व मार्गदर्शन घेऊन करणे गरजेचे आहे.मुळात या अकराव्या विकासाची दिशा जपान प्रमाणे नाही किंवा पहिल्या ते तिसर्या मुंबई प्रमाणे नाही तर शेषवंशी सम्राट सातवाहन व सोमवंशी राजा बिंबदेवाच्या दूरदर्शी धोरणांनुसार ठरवणे सर्वहितप्रद ठरेल. असे प्रतिपादन धर्मसभा-विद्वत्संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांनी जनतेशी संवाद साधताना केले.